फूल
कमळ हे पाण्यात वाढणार्या एका वनस्पतीचे फूल आहे. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा आहे. तिच्या सुमारे १०० जाती जगभर आढळतात. मात्र तिचे मूळस्थान भारत, चीन आणि जपान असावे. इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत तिचा प्रसार झाला आहे.
कमळाच्या खोडा-पानाचे वर्णन
साधारणपणे गोडय़ा आणि उथळ पाण्यात वाढणारी ही वनस्पती एक ते दीड मीटर उंच आणि एकाच पातळीत येन मीटरपर्यंत पसरते. खोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते. पाने मोठी वर्तुळाकार, छत्राकृती, ६०-९० से.मी. व्यासाची असतात. पानाचे देठ लांब असतात. पानावरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाची पाने आणि फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येऊन वाढतात. कमळाचे फूल सुगंधी आणि मोठे असते. फुलांचा रंग जातींनुसार वेगवेगळा असतो. आपल्याकडे मुख्यतः गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची कमळे आढळतात.कामालाकडे विविध कितके आकर्षित होत असतात त्यामुळे तेतील जैविविधता टिकून राहते
कमळाची पुष्पथाली (कमळकाकडी) आणि बी (कमलाक्ष) यांचा वापर अनेक भारतीय, विशेषतः सिंधी लोक खाण्यासाठी करतात.
वैदिक महत्त्व
वैदिक वाड्मय कमळाचे गुणगान करताना थकत नाही. भगवान कृष्णानेही गीतेमध्ये कमळाला आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा उपदेश केलेला होता.
अनासक्तीचा आदर्श म्हणजे कमळ. संसारात राहूनही संसाराच्या दोषांपासून मुक्त राहण्याची जीवन दृष्टी कमळ देते. कमळाचे पान (पद्मपत्र) पाण्यात असूनही पाण्याचा एक थेंबही स्वत:ला लागू देत नाही. 'जलकमलवत्' संसारात राहाण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे.
- जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥ ६८ ॥
- तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥
- तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि ऊर्मी । झांकोळेना ॥ ७० ॥
- तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे । जैसे जळीं जळें न शिंपें । पद्मपत्र ॥ ७१ ॥
पाचव्या अध्यायात योगयुक्त पुरुषाची लक्षणे सांगतानाज्ञानेश्वर माऊली म्हणतात:
- आतां अधिष्ठानसंगती| अशेषाही इंद्रियवृत्ती| आपुलालिया अर्थीं| वर्तत आहाती || ४८||
- दीपाचेनि प्रकाशें| गृहींचे व्यापार जैसे| देहीं कर्मजात तैसे| योगयुक्ता || ४९||
- तो कर्में करी सकळें| परी कर्मबंधा नाकळे| जैसें न सिंपे जळीं जळें| पद्मपत्र || ५०||
मानव परिस्थितीचा गुलाम आहे ही निराशाजनक विचारधारा भारतीय संस्कृतीला मान्य नाही. योगायोगाने वाईट वातावरणात/ परिस्थितीत जन्म झाला असला तरी पण मानव स्वतःचे ध्येय उच्च आणि दृष्टी उन्नत ठेवील तर तो मांगल्याकडे जाऊ शकतो अशी भारतीय संस्कृतीची धारणा आहे. चिखलात राहूनही ऊर्ध्व दृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ ही गोष्ट किती सरळपणे समजावते आहे! कमळाला चिखलात निर्माण करून प्रभूने आपल्याला परिस्थिती निरपेक्ष जीवन जगण्याच्या प्रेरणेचे आगळे दर्शन घडविले आहे.
तसेच कमळ हे सौंदर्याचेही प्रतीक आहे. कवींनी मानवाच्या प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिलेली आहे. भगवंताच्या अवयवांनाही कमळाची उपमा देऊन ऋषीमुनींनी त्याचे पूजन केले आहे.
सारांश, कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शन होय!
No comments:
Post a Comment